“त्या” काळवीट मृत्यूप्रकरणी पर्यावरणीय संस्थांकडून उपाययोजनांसाठी निवेदन; दिला आंदोलनाचा इशारा
दोन दिवसांपूर्वी सोलापुरातील देशमुख वस्ती हिरज रोडवर तब्बल 13 हरणांचा अंदाज न आल्याने उड्डाण पुलावरून कोसळून जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली. मागील वर्षी अशा दोन घटना घडलेल्या असताना यापूर्वीच याठिकाणी संरक्षक जाळी लावण्याच्या सूचना वनविभाग आणि महामार्ग प्राधिकरण याना देण्यात आल्या होत्या परंतु त्यांनी कोणतीच उपाययोजना केली नाही परिणामी एवढ्या मोठ्या संख्येने काळविटे मृत्यूमुखी पडली. याला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आज वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन, सोलापूर, GIBCF आणि वाईल्डलाईफ केयर या पर्यावरणीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपवनसंरक्षक वनविभाग धैर्यशील पाटील तसेच NAH प्रकल्प संचालक एम. डी. चिटणीस याना येत्या 8 दिवसात विविध उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आले. जर 8 दिवसात या उपायोजना केल्या नाहीत तर नवव्या दिवशी या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी GIBCF चे पंकज चिंदरकर यांनी आपले डोके मुंडन करून घडलेल्या घटनेचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
यावेळी wcas चे शिवानंद हिरेमठ, अजित चौहान, संतोष धकपाडे, GIBCF चे पंकज चिंदरकर, वाईल्डलाईफ केयरचे प्रवीण जेऊर इत्यादी उपस्थित होते.